Saturday, August 7, 2010

{http://www.kavyatarang.co.cc/} कर्ज घेता का कर्ज?

 

कर्ज घेता का कर्ज?

 

 

 

 

शनिवार, ऑगस्ट २०१०
आपल्या देशाचे दुसरे नाव 'बोलणाऱ्यांचा देश' असे ठेवले पाहिजे. बघावे तिकडे किंवा ऐकावे तिकडे कोणीतरी बोलतच असतो. ट्रेनमध्ये, बसमध्ये, घरांमध्ये, कार्यालयांमध्ये सगळीकडे मुक्त संवाद सुरू असतो. चित्रपटगृहांमध्ये खरे तर आपण चित्रपट पाहण्यासाठी जातो. परंतु तिथेही लोक एकमेकांशी बोलत असतात आणि मग कोणीतरी 'शूक-शूक' करून त्यांची बोलती बंद करतो. जे प्रेक्षक बोलण्यासाठी तोंड उघडत  नाहीत ते समोसे, पॉपकॉर्न, बर्गर असे काहीतरी तोंडात कोंबून तोंडे हलवीत असतात आणि हातातील प्लास्टीकच्या वेस्टनांचे आवाज करीत असतात. इंटरनेटमुळे अलिकडे लोकांचा एकमेकांशी संवाद कमी झाला वगैरे म्हणतात त्यात काही तथ्य नाही. लोक बोलतात आणि बोलून थकले की नेटवर बसतात. अनोळखी सहप्रवाशाची खोदून खोदून चौकशी करून गूळ काढण्याची वृत्ती भारताखेरीज अन्य कुठेही दिसणार नाही. भारतीयांना बोलण्याचा, ऐकण्याचा आणि ऐकवण्याचा जो सोस आहे. त्यामुळेच भारताने 'मोबाईल'च्या क्षेत्रात एवढय़ा गतीने प्रगती केली. मोबाईलच्या क्षेत्रात प्रगती केली याचा अर्थ नवे शोध लावले किंवा आहे त्या तंत्रज्ञानात सुधारणा केली असे नव्हे, मोबाईलच्या वापरात आघाडी घेतली. आज जगात मोबाईलधारकांची विक्रमी संख्या भारतात आहे. 'टॉकटाईम'चा हिशोब केला तर भारतीय माणूस सर्वाधिक काळ कानाशी किंवा तोंडाशी मोबाईल लावून असतो आणि एसएमएसच्या सुविधांचा वापर किंवा गैरवापरही भारतात सर्वाधिक होत असावा. मोबाईलच्या या वेडाचे एका विशाल 'बाजारसंधी'मध्ये रूपांतर झालेले आहे आणि त्याचा फटका गुरुवारी चक्क अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनाच बसला. त्यांची एक अतिशय महत्त्वाची मिटिंग सुरू असताना त्यांचा मोबाईल वाजला. प्रणवदांनी 'हॅलो' म्हणताच, पलीकडच्या बाजूने, 'आम्ही तुम्हाला सुलभ हप्त्यांवर कर्ज देऊ इच्छितो, कागदपत्रांची कटकट नाही, व्याजाचा दर वाजवी आहे, बोला, किती कर्ज हवे आहे?' अशी विचारणा झाली. 'हे लोक मलाही सोडत नाहीत' असे प्रणवदा वैतागून म्हणाले आणि मग  त्यांना आलेल्या 'ऑफर'ची माहिती त्यांनी इतरांना दिली. 'मोबाईल' ही एक मोठी सोय आहे, असे समस्त भारतीयांना वाटते; परंतु ती सोय नसून संधी आहे हे अचूक ओळखणाऱ्यांची संख्याही प्रचंड मोठी आहे. 'दहा हजार ग्राहकांचे फोन नंबर्स आम्ही तुम्हाला देतो, बोला किती देणार त्याचे?' असे व्यवहार मोबाईल सेवा पुरविणाऱ्या कंपन्या सर्रास करीत असतात. 'ग्राहकांचे नंबर्स आणि त्यांची वैयक्तिक माहिती' हा मोठा 'कच्चा माल' ठरतो आहे. या कच्च्या मालाच्या आधाराने अनेक कंपन्या आपली पक्की 'बाजारपेठ' तयार करीत आहेत. आपण कुठल्या तरी विवंचनेत असताना फोन येतो.फोन करणारी व्यक्ती आपल्या नावाचा हमखास चुकीचा उच्चार करते. फोन करणारी बहुधा मुलगी असते. कारण 'गोड आवाजांचा' पुरुष ग्राहकांवर एक नाजूक मानसिक प्रभाव पडतो तर स्त्री ग्राहकांनाही मुलींशी बोलताना अधिक मोकळे वाटते. ज्याला फोन केला जातो त्याचा पगार किती आहे, त्याची आर्थिक पत काय आहे, जीवनशैली कशी आहे, त्याच्या घरी कुठल्या वस्तू आहेत, कुठल्या नाही आहेत, काहीतरी खरेदी करण्याच्या मन:स्थितीत- परिस्थितीत तो आहे अथवा नाही हे एक वेळ त्याच्या घरच्या लोकांना, मित्र-मैत्रिणींना ठाऊक नसेल; परंतु 'अज्ञातस्थळी' बसलेल्या त्या 'अनोळखी' विक्रेत्याला मात्र ते ठाऊक असते. कम्युनिस्ट राजवटींमध्ये नागरिकांच्या खासगी आयुष्यावर अतिक्रमण केले जात होते, त्यांच्यावर सतत पाळत ठेवली जात होती आणि एक प्रकारे त्यांच्या आयुष्यातले निर्णय तिसराच कोणीतरी गुप्तपणे घेत होता हे आपल्याला ऐकून, वाचून आणि चित्रपटांमधून माहिती आहे. आज लोकशाही राजवटीमध्ये राहून आपण त्याच 'कम्युनिस्ट' पद्धतीचा अनुभव घेत आहोत. फरक फक्त एवढाच, की त्या ठिकाणी 'विचारांचे मार्केटिंग' केले जात होते आणि आपल्याला नको असलेले 'विचार' नागरिकांच्या डोक्यात येऊ नयेत यासाठीची खटपट होती. तर आताच्या या  मार्केटिंगमध्ये नको असलेल्या वस्तूंची कर्जाची, उधारीची गरज पटवून देण्याचा प्रयत्न असतो. त्यासाठी केवळ भारतीयांच्या मानसिकतेचाच नव्हे तर कुटुंबव्यवस्थेचाही अभ्यास या 'बाजार'वाल्यांनी केलेला आहे. ''तुमची आमच्या खास ग्राहकांच्या यादीत निवड झालेली आहे. तुम्हाला आमच्याकडून काचेचा एक सुंदर सेट मोफत दिला जात आहे,'' असा एखाद्या शनिवारी फोन येतो. अट फक्त एकच असते, नवरा-बायकोने एकत्र जाऊन हे 'फ्री गिफ्ट' घ्यायचे. शनिवार म्हणजे संध्याकाळ बहुधा मोकळी असते, मग नवरा-बायको फ्री गिफ्ट घ्यायला जातात आणि एखादी 'आकर्षक योजना' त्यांच्या गळ्यात बांधली जाते. नवीन व्यवस्थेत, विशेषत: स्त्रिया नोकरी करीत असताना, कुठल्याही 'आकर्षक' योजनेत पैसे गुंतविण्याचा निर्णय एकटा पती किंवा एकटी पत्नी घेत नाही हे त्यांना अचूक ठाऊक असते. हे 'फ्री गिफ्ट' आपल्याला किती महागात पडले ते 'भाग्यवान ग्राहकाला' खूप उशिरा कळते. तेव्हा मग त्या आकर्षक योजनेच्या सूत्रधारांचे फोन लागत नाहीततुमच्याशी ज्या व्यक्तीने व्यवहार केलेला असतो ती व्यक्ती तोवर नोकरी सोडून गेलेली असते आणि कंपनीचे स्थानिक कार्यालय बंद होऊन तिचे 'हेडऑफिस' कोलकाता किंवा असेच दूर कुठेतरी असते. 'टेलिमार्केटिंग' ही बहुतांश वेळा शुद्ध 'टेली फसवणूक' असते. 'ग्राहकाला आकर्षित करणे' हा प्रत्येक विक्रेत्याचा अधिकार आहे; परंतु त्याचे रुपांतर जेव्हा ग्राहकाला 'जाळ्यात ओढण्या'मध्ये होते तेव्हा ते नागरिकांच्या निर्णय स्वातंत्र्यावर अतिक्रमण ठरते. 'ग्राहक तुमच्यापर्यंत पोहोचण्याची वाट पाहू नका, तुम्हीच त्यांच्यापर्यंत पोहोचा' हा मार्केटिंगचा नवा मंत्र असून त्यासाठी 'मोबाईल' हे सर्वात मोठे माध्यम बनलेले आहे. मोबाईल कंपन्या आपली 'सेवा' पुरवून जेवढी कमाई करतात त्यापेक्षा अधिक पैसा त्यांना बहुधा ग्राहकांचे नंबर आणि त्यांची माहिती इतरांना देऊनच मिळत असावा. अशा प्रकारच्या फसवणुकीत खुद्द मोबाईल कंपन्याही मागे नाहीत. 'आम्ही आपणाला अमुक अमुक सेवा पुरवित आहोत, ती तुम्हाला नको असेल तर दोन तासांत तसे कळवा अन्यथा तुमचा होकार गृहीत धरून सेवा सुरू करण्यात येईल,' असा एसएमएस येतो. त्या मेसेजकडे किमान ५० टक्के लोकांचे विविध कारणांनी दुर्लक्ष होते, अशी 'शिकार' झालेले काही ग्राहक भांडून पैसे परत मिळवितात, काहींना तेवढा वेळ नसतो त्यामुळे ते स्वत:शीच वैतागतात तर काही मुकाट ही सेवा स्वीकारतात आणि कंपनीच्या खात्यावर बिनभोबाट लाखो रुपये जमा होतात. 'ट्राय'च्या मदतीने अशा अनाहूत फोन- मेसेजेसवर नियंत्रण आणण्याचे खूप प्रयत्न आजवर झालेले आहेत. ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठीही अनेक संस्था प्रयत्नशील असतात; परंतु तरीही अशा सर्वच प्रयत्नांना मर्यादा पडतात. काही काळ सगळे र्निबध पाळले जातात आणि मग पुन्हा 'मार्केटिंग' जोरात सुरू होते. फुटपाथवरील अतिक्रमण जसे प्रत्येक वेळी चार-आठ दिवसांत पूर्ववत सुखाने हातपाय पसरते तसेच या र्निबधाचे आहे. अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनाच थेट कर्जाची 'ऑफर' आल्यावर दूरसंचारमंत्री राजा यांनी लगोलग 'ट्राय'ला पत्र पाठवून असे अनाहूत, उपरे फोन रोखण्यासंबंधी तातडीने उपाययोजना करण्यास सांगितले. अर्थात अशी 'तातडीची' उपाययोजना या पूर्वीही अनेकदा केली गेली आहे. या सर्व व्यवहारात एवढा प्रचंड पैसा गुंतलेला आहे, की त्या हितसंबंधाची एक गुप्त साखळी कायम कार्यरत असते. चॅनेलवरील आवडत्या गायकासाठी अथवा आवडत्या नर्तकासाठी प्रेक्षक त्याला पाठिंबा म्हणून 'एसएमएस' करतात तेव्हा ते त्या कलेला प्रोत्साहन देत नसतात, तर मोबाईल कंपन्यांचा धंदा वाढवित असतात. आपली इच्छा असो-नसो, कळत किंवा नकळत आपण सर्वच एका विशाल 'टेलिमार्केटिंग नेटवर्क'चा भाग झालो आहोत. तुम्ही फक्त मेसेज पाठवून ऑर्डर द्या, फ्रीज- टी. व्ही.पासून तर चमत्कारी रुद्राक्ष माळेपर्यंत सर्व काही घरपोच देण्यासाठी लोक अक्षरश: टपलेले आहेत. 'चार पैसे जास्त गेले तरी चालतील नड भागणे महत्त्वाचे, वेळ निभणे महत्त्वाचे' असा प्रसंग प्रत्येकाच्याच बाबतीत कधीतरी येत असतो. अशा वेळी दहा जणांची 'नड भागते' आणि उरलेले नव्वद नाडले जातात. आपल्या देशात मोबाईलचा प्रसार आणि प्रचार एवढय़ा वेगाने झाला ती नागरिकांची गरज म्हणून नव्हे तर मार्केटिंगचे आयते जाळे तयार व्हावे म्हणून! मोबाईल वापरणे याचा अर्थ आधुनिक होणे, आजच्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे असा आपण घेतो. संपर्कात राहण्यासाठी, कामे तत्परतेने मार्गी लागण्यासाठी या संपर्क क्रांतीचा मोठाच उपयोग झाला हे नाकारता येत नाही. आपण एकेकाळी मोबाईलशिवाय कसे श्वास घेत होतो असा प्रश्न पडावा इतपत मोबाईल आपल्या आयुष्याचा एक भाग झाला आहे; परंतु आपण ज्याला सोय म्हणतो ती अनेकांच्या दृष्टीने संधी असते आणि या संधी-साधूंच्या मार्केटिंगला आपण बळी पडत असतो, बळी पडत राहणार आहोत. 'जागो ग्राहक जागो' म्हणत सरकार आपले कर्तव्य पूर्ण करते; परंतु त्याच सरकारमधील एका ज्येष्ठ मंत्र्याला महत्त्वाची बैठक सुरू असताना फोन करून 'कर्ज हवे का?' अशी विचारणा होते. तेव्हा संधी-साधू इच्छिणारे किती आणि कुठवर पसरलेले आहेत हे लक्षात येते.

Source:- http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=91754:2010-08-06-14-20-52&catid=29:2009-07-09-02-02-07&Itemid=7

__._,_.___
Recent Activity:
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------Group Policies (Amended March 04, 2007)

1) All mails are subjected to moderation. This may cause some trivial delay in posting your mails. Please bear with us.

2) Please do not post any advertisements (matrimonial ads, mails publicizing other groups etc.) on this group.

3) Please be cautious while sending any attachments or forwards. When you send forwards, we request you to retain only the relevant content of the mail, which you are forwarding. Also edit the subject giving a proper subject to the mail discarding unwanted matter. This will make the mail neat and legible.

4) Appreciation of mails sent by members should be directed to the senders personal email address and not on the group.

5) Not all forwards will be approved. Only forwards with some novelty will be approved. To give an example, forwards containing PowerPoint slides. Some slides contain only sceneries, pictures of cute dogs/ cats, babies, mountains, flowers etc. Such forwards will not be approved.
.

__,_._,___

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.